सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे संबोधले जाते. या अमावस्येच्या पर्वकाळामध्ये खंडोबा गडावरून पालखी सोहळा उत्सवमुर्तीसह कहास्नानासाठी वाजत गाजत प्रस्थान ठेवतात. भंडाऱ्याच्या उधळणीत अब्दागिरी, छत्रचामरे, मानाच्या अश्वासह प्रस्थान ठेवलेला हा सोहळा मल्हार गौतमेश्वर मंदिर मार्गे कहनदीतिरी पापनाशतिर्थावर समस्त पुजारी, ग्रामस्थ, खांदेकरी मानकरी घेऊन जातात. विधिवत उत्सवमुर्तीसह भाविक भक्त ही स्नानाची पर्वणी लुटतात. त्यानंतर पुन्हा धालेवाडीकरांचा मान घेत पालखी सोहळा, फुलाई माळीण कट्टा, जानाई मंदिर कट्टा येथे स्थिरावून नगरीच्या मुख्य चौकातून गडकोटात दाखल होतो आणि 'रोजमुरा' (चिमुटभर तृणधान्य) वाटप होऊन सोहळ्याची सांगता होते. राज्यातून आलेले भाविक भक्त कहा स्नानाची पर्वणीसह जागरण गोंधळ, दिवटी पाजळणे, कोटंबा पुजणे व तळी भंडार करीत आपला कुलधर्म कुलाचार श्रद्धापूर्वक केला जातो.